नागांव गाव हे करवीर तालुक्याचे दक्षिण बाजूस कोल्हापुर पासून 22 कि.मी. अंतरावर दुधगंगा नदीच्या तीरावर वसले आहे. मौजे नागांव गावची लोकसंख्या सन 2001 च्या जनगणनेनुसार 2078 इतकी आहे. तसेच गावचे कुलदैवत अंबाबाई असुन गावचे श्रध्दास्थान बिरदेव आहे. या शिवाय गावामध्ये महादेव मंदीर, हनुमान मंदीर, जैनबस्ती, थळोबा, म्हातारबाबा अशी मंदीरे आहेत. तसेच मोठ्या आदराने या देवाची गावामध्ये पुजाअर्चा होत असते.
गावचे ग्रामदैवत अंबाबाई असुन अंबाबाई देवीचा उत्सव माहे मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात मोठया प्रमाणात साजरा होत असतो. तसेच गावामध्ये बिरदेव देवालय असुन बिरदेव देवाची तीन वर्षातुन एखदा यात्रा मोठया प्रमाणात भरत असते या मध्ये देव जळास जाणे, हेडाम खेळने, ढोल वादंन व भंडारा उत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असतो.
या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र या भागातुन धनगरबांधव व इतर लोक मोठया प्रमाणात गावामध्ये जमा होतात. तसेच बिरदेव मंदीरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करणेत येते. गावामध्ये हनुमान जयंती निमित्य रामनवमी पारायण सोहळा सुरु होत असतो या पारायण सोहळ्यामध्ये पूर्ण गाव मोठया भक्तीभावाने सामील होत असते. तसेच गावामध्ये गणेश उत्सवही मोठया प्रमाणात साजरा होत असतो. सदर उत्सवावेळी गावात व्यसनमुक्ती, कुटुंब नियोजन, ऐतिहासीक व सामाजीक कार्यक्रम होत असतात.
